मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने, ३४ कंन्टेन्मेंट झोन तर ३०५ इमारती सील
मुंबई – मुंबईत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतोय. गेल्या सहा दिवसांत तब्बल १३ हजार रुग्णांची वाढ झाली आहे. हा संसर्ग आणखी झपाट्याने होऊ नये याकरता मुंबई पालिका सतर्क झाली आहे. शनिवारी ३ हजार ६२ रुग्ण सापडल्याने मुंबई पालिकेने मुंबईतील ३०५ इमारती सील केल्या आहेत.
वाचा :-राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजार रुग्णांनी वाढ, 70 मृतांची नोंद
राज्यात कोरोनाचा वेग कमी झाला होता. त्यामुळे मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सेवा पूर्वपदावर करण्यात येत होत्या. मात्र, त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसतेय. शहरी भागात तर कोरोनाचा विस्फोट झाला आहे.त्यातच, मुंबईत काल सर्वाधिक रुग्ण सापडल्याने पालिका आणि आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. मागील सहा दिवसांत राज्यात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी १३ हजार ९१२ रुग्ण मुंबईतील आहेत. त्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेनं चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. मुंबईत ७ ऑक्टोबर २०२० रोजी म्हणजे मागच्या वर्षी उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली होती. एका दिवसातील ती रुग्णसंख्या होती २ हजार ८४८ इतकी. त्यानंतर पहिल्यांदाच हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला आहे.
महापालिका सज्ज
वाढता प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून कंटेनमेंट झोन तयार केले जात आहे. त्याचबरोबर मॉल्स, सिनेमागृहांसह गर्दी होणाऱ्या सार्वजनिक ठिकाणीही चाचण्या करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. तर दुसरीकडे रुग्ण आढळून येणाऱ्या इमारती सील केल्या जात आहे. मागील सहा दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. १३ मार्च रोजी मुंबईत ३१ कंटेनमेंट झोन होते. तर २२० इमारती सील करण्यात आल्या होत्या. १८ मार्च रोजी त्यात मोठी वाढ झाली. कंटेनमेंट झोन ३४ झाले असून, ३०५ इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.
मुंबईत टाळेबंदी शिथिल झाल्यापासून सर्वत्र नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढला आहे. परिणामी, पालिकेने दैनंदिन चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात ५० हजार चाचण्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मॉलमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता या ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मॉल आणि मॉलमधील चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी होत असून नियम-निर्बंध धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पालिके च्या विभाग कार्यालयांमार्फत चाचण्या केल्या जाणार आहेत.