राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजार रुग्णांनी वाढ, 70 मृतांची नोंद
मुंबई -राज्यात आजही 25 हजार 681 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याने राज्यात चिंता वाढत आहे. त्यातच एकट्या मुंबईत 3 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यात गेले तीन दिवस रुग्णवाढीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. बुधवारी राज्यात २३ हजार १७९ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. त्यानंतर गुरुवारी त्यात वाढ झाली व २५ हजार ८३३ रुग्णांची नव्याने भर पडली. कोरोनाची साथ आल्यापासूनचा हा एका दिवसातील उच्चांक ठरला. त्यानंतर आज पुन्हा एकदा राज्यात २५ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने आजची आकडेवारी जाहीर केली असून हे आकडे धडकी भरवणारे आहेत. आज राज्यात ७० कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत ५३ हजार २०८ जणांचा या साथीने बळी घेतला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२० टक्के एवढा आहे. आज राज्यात २५ हजार ६८१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २१ लाख ८९ हजार ९६५ कोरोना बाधित रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) सध्या ९०.४२ टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८० लाख ८३ हजार ९७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४ लाख २२ हजार २१ (१३.३९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ६७ हजार ३३३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर ७ हजार ८४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.