केंद्रीय कायदे मंत्री असतानाही वंचीत, शोषित, गोरगरीबांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर झटलेः व्याख्याते विक्रांत शेळके
एक्झर्बिया अबोड सोसायटीमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी
वडगांव मावळः मानव मुक्तीच्या इतिहासात भारतातील विसाव्या शतकातील महायोद्धा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. भारताने बाबासाहेबांचे विचार पूर्णपणे स्वीकारले असते तर केव्हाच देश महासत्ता झाला असता. बाबासाहेब या युगपुरुषाचे मार्गदर्शन आज सार्या विश्वाला लाभदायक ठरत आहे आणि त्यांनी लिहिलेले संविधान अखंड विश्वात प्रथम क्रमांकाचे आणि सर्वोत्कृष्ट आहे. शिवाय या देशाचा कारभार या संविधानानुसार चालतो. बाबासाहेबांनी महिलांसाठीही अनेक महत्त्वपूर्ण कायदे अंमलात आणले आहेत. आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष केल्यामुळे ते केंद्रीय कायदे मंत्री असतानाही वंचीत, शोषित, गोरगरीबांसाठी ते आयुष्यभर झटले, असे प्रतिपादन व्याख्याते, कवी विक्रांत यशवंत शेळके यांनी केले. जांभुळ येथील एक्झर्बिया अॅबोड सोसायटीमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती रविवारी मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावेळी शेळके यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
एक्झर्बिया अॅबोड सोसायटीमधील भीमजयंती संयोजन समितीतर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मध्यरात्रीपासूनच अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. शनिवारी रात्री 12 वाजता सोसायटीमध्ये फटाक्यांची आतषबाजी करत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. रविवारी दिवसभर भीमगितांनी सोसासटी दणाणून गेली. शुभ्र पांढऱ्या रंगाचे वस्त्र तसेच डोक्यावर निळ्या रंगाचे फेटे परिधान करून नागरिक बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी येत होते.
सायंकाळी 7 वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेची सोसायटीच्या गेटपर्यंत धूमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये अबालवृद्ध, महिला-पुरुष यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. त्यानंतर लहानग्यांच्या नृत्याचा कार्यक्रम पार पडला. तसेच स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
भीमजयंती संयोजन समितीचे अध्यक्ष पंकज पखाले, उपाध्यक्ष भीमसेन गडांकुश, खजिनदार दीपिका वाकडे, सचिव विजय भोरे, संयोजन व्यवस्थापन सतिश कदम, शोभा गवळी मॅडम, प्रकाश कांबळे, पुंजाजी ससाणे, विजय तायडे, शोयब शेख यांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे कार्यक्रम उत्तमप्रकारे पार पडला. सुकेशनी भोरे यांनी खुमासदार शैलीत भारदस्त आवाजात सूत्रसंचालन करत कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांसह सर्वांचीच मने जिंकली.