breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

#INDvsENG भारताकडून इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा; मालिकेत 2-1 अशी आघाडी

लंडन – ओव्हलच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडचा 157 धावांनी धुव्वा उडवला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपवला होता. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने दुसऱ्या डावात 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचे आव्हान दिले. भारताने दिलेले हे आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांना पेलवले नाही. इंग्लंडचा संघ 210 धावांमध्ये गारद झाला. त्यामुळे भारताने या सामन्यात इंग्लंडवर 157 धावांनी मात करत मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.

चौथ्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या डावात भारताने २० षटकांत अवघ्या ३९ धावांत लोकेश राहुल (१७), रोहित शर्मा (११) आणि चेतेश्वर पुजाराला (४) गमावले. दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने रोहितला बाद केले. ओली रॉबिन्सनने राहुलला पायचित पकडले आणि जेम्स अँडरसनने पुजाराला यष्टीपाठी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. पुजारानंतर भारताने रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी बढती दिली. मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. वोक्सने जडेजाला १० धावांवर बाद केले. मग लंचनंतर विराटने आपले अर्धशतक फलकावर लावले. परंतु चांगल्या लयीत दिसणारा विराट रॉबिन्सनचा बळी ठरला. रॉबिन्सनने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. विराटने ८ चौकारांसह ५० धावांची खेळी केली. जडेजा-विराटनंतर अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंतच्या जोडीकडून संघाला सावरण्याच्या मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र दोघेही पुन्हा एकदा अपयशी ठरले. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने उमेश यादवला सोबत घेऊन ३१ चेंडूत तुफानी अर्धशतक ठोकले. दोघांनी अर्धशतकी भागीदारीही फलकावकर लावली. मग ख्रिस वोक्सने शार्दुलला पायचित पकडले, शार्दुलने ३७ चेंडूत ३ षटकार आणि ७ चौकारांसह ५७ धावा चोपल्या. शार्दुलनंतर इंग्लंडने १९१ धावांवर भारताचा गाशा गुंडाळला. इंग्लंडकडून वोक्सने चार, तर रॉबिन्सनने तीन बळी घेतले. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या रोरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर फॉर्मात असलेल्या कर्णधार जो रूटने डेव्हिड मलानसोबत संघाचे अर्धशतक पूर्ण केले. परंतु भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने सुरेख चेंडूवर रूटची दांडी गुल केली, रूटला २१ धावा करता आल्या. मलानही उमेश यादवच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३१ धावा केल्या. इंग्लंडचा अर्धा संघ माघारी परतल्यानंतर ओली पोपने सुरुवातीला जॉनी बेअरस्टो आणि नंतर मोईन अलीसोबत भागीदारी रचली. मग सिराजने बेअरस्टोला आणि जडेजाने अलीला बाद केले. तसेच शतकाच्या जवळ पोहोचलेल्या पोपला ८१ धावांवर शार्दुलने बाद केले. पोपने आपल्या खेळीत ६ चौकार ठोकले. पोपनंतर इंग्लंडचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते, मात्र ख्रिस वोक्सने ११ चौकारांसह झुंजार अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले आणि बुमराह व जडेजाला दोन बळी घेता आले.

भारताच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला लोकेश राहुल आणि रोहित शर्माने उत्तम अर्धशतकी सलामी दिली. मात्र भारताच्या ८३ धावा झालेल्या असताना जेम्स अँडरसनने राहुलला यष्टीपाठी झेलबाद केले. राहुलने ६ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. मग रोहितने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या पुजारासोबत शतकी भागीदारी रचली. ६४व्या षटकात रोहितने वैयक्तिक ९४ धावांवर असताना षटकार ठोकत शतक साजरे केले. त्याचे हे भारताबाहेर कसोटीतील पहिलेच शतक ठरले. मग चहापानानंतर पुजाराने आपले ३१वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. मात्र नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडने ८१व्या षटकात रोहित आणि पुजाराला माघारी धाडले. रॉबिन्सनने या दोघांना झेलबाद केले. रोहितने १४ चौकार आणि एका षटकारासह १२७ आणि पुजाराने ९ चौकारांसह ६१ धावा केल्या. या दोघांनंतर चौथ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जडेजाने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. मात्र तासाभरात ख्रिस वोक्सने जडेजा (१७) आणि त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेला पायचित पकडले. रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. मग चांगल्या फॉर्मात असलेल्या विराटला मोईन अलीने वैयक्तिक ४४ धावांवर बाद केले. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या ओव्हर्टनने विराटचा झेल घेतला. विराटने ७ चौकार लगावले. मग लंचनंतर शार्दुल ठाकूर आणि ऋषभ पंतने दमदार भागीदारी केली. शार्दुलने अप्रतिम फलंदाजी करत सलग दुसरे अर्धशतक ठोकले. मात्र जो रूटने त्याला बाद केले. शार्दुलने ७ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा पूर्ण केल्या. त्याच्यानंतर ऋषभ पंतही अर्धशतक करून बाद झाला. पंतने ५० धावांच्या खेळीत ४ चौकार ठोकले. तसेच चहापानानंतर उमेश यादवने २५ धावा जोडल्या. मात्र ओव्हर्टनने उमेशला बाद करत भारताचा डाव ४६६ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंडकडून वोक्सला तीन आणि रॉबिन्सन, मोइन अलीला प्रत्येकी दोन बळी मिळाले.

सोमवारी ७७ धावांवरून पुढे खेळताना रॉरी बर्न्‍स आणि हसीब हमीद यांनी अर्धशतके झळकावतानाच शतकी भागीदारी रचली. परंतु शार्दूलचे गोलंदाजीसाठी आगमन होताच त्याने बर्न्‍सचा (५०) अडथळा दूर केला. डेव्हिड मलान (५) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने हमीदचा (६३) त्रिफळा उडवला. १४१ धावांवर तिसरा बळी गमावल्यानंतर मात्र इंग्लंडची घसरगुंडी उडाली. जसप्रीत बुमराने जॉनी बेअरस्टो (०) आणि ऑली पोप (२) यांना त्रिफळाचीत करून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. फिरकीपटू जडेजाने मोईन अलीला (०) पॅव्हेलियनचा मार्ग दाखवला. तर शार्दूलने दुसऱ्या स्पेलमध्ये इंग्लंडचा सर्वाधिक भरवशाचा फलंदाज जो रूटला (३६) त्रिफळाचीत करून भारताचा विजय सुनिश्चित केला. त्यानंतर ख्रिस वोक्स (१८), क्रेग ओव्हर्टन (१०) यांनी थोडा वेळ भारताचा विजय लांबवला. मात्र उमेश यादवने या दोघांना माघारी पाठवले. अखेर ९३व्या षटकात उमेशनेच जेम्स अँडरसनला बाद केले आणि कोहलीसह सर्व खेळाडू आणि स्टेडियममधील चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button