‘माझं भाजपात येणं आणि राणेंचं जाणं याचा काही संबंध नाही’; अशोक चव्हाण यांचं विधान
मुंबई | माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. दरम्यान, राज्यसभेसाठी नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती मात्र अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणेंऐवजी अशोक चव्हाणांची निवड का केली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावरून अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण म्हणाले की, आमचे स्टार्स कुठेतरी मिसमॅच होतायत. हे असं का होतंय ते मला माहिती नाही. मी परवा भाजपात प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांनी फोन केला होता. खूप दिवसांनी त्यांनी मला फोन केला होता. पक्षात आल्याबद्दल त्यांनी माझं अभिनंदन केलं. परंतु, राज्यसभा उमेदवारीबद्दल मला काही सांगता येणार नाही. कारण तेव्हा मी भाजपात नव्हतो. माझं येणं आणि नारायण राणे यांचं जाणं याचा काही संबंध नाही. पक्ष नेतृत्वाने असा निर्णय का घेतला हे मला माहिती नाही.
हेही वाचा – ‘माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात..’; अजित पवारांचं विधान
माझ्या उमेदवारीबद्दल ठरलं होतं असं मी म्हणणार नाही. परंतु त्यांना (भाजपाचं दिल्लीतलं नेतृत्व) जरूर वाटलं असेल की माझ्यासारखा अनुभवी नेता, ज्याने प्रशासनात काम केलं आहे, ज्याने राजकीय क्षेत्रात काम केलं आहे. त्याचा दिल्लीत अधिक उपयोग होऊ शकतो, असं त्यांना कदाचित वाटलं असेल. त्यामुळे तातडीने त्यांनी निर्णय घेऊन मला संधी दिली. हा त्यांचा मोठेपणा आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.
दरम्यान, २००८ साली काँग्रेसने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी नारायण राणे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र अचानक अशोक चव्हाण यांचं नाव पुढं आलं आणि ते मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा असच काही घडलं आहे. नारायण राणे याचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत होतं. परंतु अचानक अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली.