‘माझा परिवार सोडला तर बाकी माझ्या विरोधात..’; अजित पवारांचं विधान
बारामती | बारामतीत आज अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी भावनिक आवाहन केले. तसेच बंड का केले? बंडाच्या आधी आणि नंतर काय काय झाले? याची सर्व माहिती बारामतीकरांना दिली. आगामी निवडणुकीत माझ्याविरोधात प्रचार केला जाईल, त्याला बारामतीच्या जनतेनं उत्तर द्यावं, असे ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, आमचे वरिष्ठ (शरद पवार) मध्यंतरी बोलले मी राजीनामा देतो. आम्ही कुणीही राजीनामा मागितला नव्हता. वरिष्ठांच्या इच्छेनंतर आम्ही सर्व नेते बसून आताच्या खासदार (सुप्रिया सुळे) यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. पक्षाच्या इतर नेत्यांना मी विश्वासात घेऊन हे मान्य केलं. पण दोन-तीन दिवसांत काय चक्र फिरली माहीत नाही, ते म्हणाले मीच अध्यक्ष राहतो. आम्ही सातत्याने वरिष्ठांना सांगत होतो की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे बहुमत राहिले नाही तर आपण देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊ. पण त्यालाही विलंब झाला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
हेही वाचा – इंग्लंडचा संघ फलंदाजीला न येताही त्यांना फ्री मिळाल्या ५ धावा; जाणून घ्या नेमके प्रकरण काय?
वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केले तर आम्ही चांगले आणि मी स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष झालो तर चोर ठरलो का? म्हणजे वरिष्ठांच्या पोटी आम्ही जन्माला आलो असतो तर आम्ही चांगले. मग अध्यक्षही झालो असतो, पक्षही ताब्यात आला असता. शेवटी सध्या भावाच्या पोटीच जन्माला आलो ना. म्हणून सांगतो लोकसभा निवडणुकीत काही लोक भावनिक करतील, त्याकडे लक्ष देऊ नका, असं अजित पवार म्हणाले.
बारामतीमध्ये आता ते एकमेव वरिष्ठ आहे. दुसरे वरिष्ठ पुणे शहरात आहेत. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले. तरी हे तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात. तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे. तुमची एकजूट आहे. तोपर्यंत माझे काम असेच चालत राहणार आहे. काही जण तुम्हाला भावनिक होऊन तुमच्यासमोर येतील. परंतु भावनेने काम होत नाही. प्रश्न सुटत नाही. रोजगार मिळत नाही. त्यासाठी तडफ लागते, असंही अजित पवार म्हणाले.