“जेव्हा एका माथेफिरुने शरद पवारांच्या कानशिलात लगावली तेव्हा…”, आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका
मुंबई |
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चाललेला शिवसेना-भाजपा संघर्ष थांबायचं नाव घेत नाही. नारायण राणे यांच्या थांबलेल्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर पुन्हा या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला सुरुवात झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेत राणे यांच्यासोबत असलेले भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही आता शिवसेनेवर कठोर टीका केली आहे. सिंधुदुर्गात लावण्यात आलेली जमावबंदी राजकीय असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसंच काही वर्षांपूर्वी एका माथेफिरुने शरद पवार यांच्या कानशिलात लगावली होती, त्या प्रसंगाची आठवणही शेलार यांनी यावेळी करुन दिली आहे.शिवसेनेला काही जुन्या प्रसंगांची आठवण करुन देताना आशिष शेलार म्हणाले, आज त्यांच्यासोबत जे सत्तेत बसले आहेत ते माननीय शरद पवार साहेब यांच्या कानशिलात एका माथेफिरुने मारल्याची दुर्दैवी घटना अख्ख्या देशाने पाहिली.
पवारांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अशी प्रतिक्रिया दिली नाही. आणि हा तर मग केवळ वाक्यातला जर तरचा मुद्दा होता कानशिलात लगावण्याचा. त्याच्यावर जी प्रतिक्रिया दिली ते एका संकुचित मनोवृत्तीचं दर्शन एका संयमित पक्षासोबत राहूनसुद्धा शिवसेनेने केलं आहे. कालही आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांना महाराष्ट्रातल्या असहिष्षुतेचे जनक असं संबोधलं होतं. ते म्हणाले होते, “स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली. त्याच महाराष्ट्रात आज मुख्यमंत्री फक्त माझं, कुटुंब माझी जबाबदारी हाच माझा जन्मसिद्ध हक्क आहे, या धोरणाने काम करीत आहेत”. “महाराष्ट्रात असहिष्णुतेचे जनक उध्दव ठाकरे हेच आहेत. वडाळ्यातील एका व्यक्तीने सरकार विरोधी लिहिले म्हणून त्याचे सार्वजनिक ठिकाणी केशवपन करण्यात आले. एका निवृत्त नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एक व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून त्यांचा डोळा फोडण्यात आला तर अभिनेत्री कंगना यांचे घर तोडण्यात आले. सरकार विरोधात बोलले म्हणून एका संपादकाला घरात घुसून अटक केलं गेलं. महाराष्ट्रात आज जे असहिष्णुतेचे हे वातावरण तयार झाले आहे त्याचे जनक उद्धव ठाकरे हे आहेत”, अशा शब्दांत शेलार यांनी टीका केली होती.