पाकिस्तानला भारताने फटकारले
- महिलांच्या हक्कांच्या प्रश्नांचा हत्यार म्हणून वापर
संयुक्त राष्ट्रे : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाकिस्तान महिलांच्या हक्कांच्या प्रश्नांचा हत्यार म्हणून वापर करीत असल्याबद्दल भारताने पाकिस्तानला फटकारले आहे. ज्या देशात ऑनरच्या नावाखाली महिलांना जगण्याचा हक्क नाकारला जात आहे आणि त्याबद्दल शिक्षाही केली जात नाही तो देश भारताबद्दल निराधार वक्तव्ये करीत आहे असे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रे सर्वसाधारण सभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्षमी पंडित यांच्यापासून इस्रोतील महिला वैज्ञानिकांपर्यंत भारतीय महिला अनेकांसाठी प्रेरणस्थान ठरल्या आहेत, असे संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय सचिव पौलोमी त्रिपाठी यांनी ‘अॅडव्हान्समेण्ट ऑफ वुमेन’ या विषयावरील चर्चासत्रात स्पष्ट केले.
महिला सक्षमीकरण आणि लिंगसमानता प्रत्याक्षात आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत असून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांच्या हक्कांच्या प्रश्नांचा हत्यार म्हणून वापर करण्यास आम्ही थारा देत नाही, आमच्या देशाच्या अंतर्गत प्रश्नांचा अनावश्यक संदर्भ देऊन एका शिष्टमंडळाने या प्रश्नाला राजकीय रंग दिला आहे, असेही त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्रे सर्वसाधारण सभेतील सहा समित्यांपैकी एक समिती सामाजिक प्रश्न, मानवी हक्कांचे प्रश्न आदींशी संबंधित आहे. त्रिपाठी यांनी पाकिस्तानचा नामोल्लेख न करता पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकारी मलीहा लोधी यांनी जम्मू-काश्मीरबद्दल दिलेल्या संदर्भाचा समाचार घेतला.