मावळमधील आजीबाई झाल्या 12वी पास
तब्बल 42 वर्षानंतर दिली परीक्षा
वडगांव मावळः मावळ तालुक्यातील नायगाव येथील राहणार्या बनताबाई पुताजी काजळे-चोपडे या वयाच्या ५८ व्या वर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण सोडल्यानंतर तब्बल ४२ वर्षानंतर त्यांनी बारावीची परिक्षा देऊन त्यात यश मिळविले. त्यांच्या या यशाचे मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे.
शिक्षणाची आवड असणारे कसेही शिक्षण घेतात. काही जणांना परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते. मात्र परत कधी संधी मिळाली ते त्या संधीच सोने करून दाखवितात. असाच काहीसा प्रकार मावळ तालुक्यातील नायगाव येथे घडला आहे. अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करणार्या बनताबाई यांनी बारावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी सरकारने दिलेल्या मुदतवाढीचा फायदा घेत बारावीसाठी बाहेरून परिक्षा देता यावी यासाठी १७ नंबरचा फॉर्म भरला.
काही शिक्षकांच्या मदतीने व चोपडे कुटुंबातील मार्गदर्शनामुळे आजींनी अभ्यासाला सुरूवात केली. घरातील काम आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका म्हणून काम केल्यानंतर अभ्यास करीत असे. अगदी जिद्दीने अभ्यास करून आजींनी बारावीची परिक्षा दिली. परिक्षेच्यावेळी वर्गावर येणारे परिक्षकही आजींची आस्थेने विचारपूस करीत त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करीत होते. नुकताच बारावी परिक्षेचा निकाल लागला.
या परिक्षेत आजींनी ४८ टक्के गुण मिळविले आहेत. आजी बारावीची परिक्षा उत्तीर्ण झाल्याची माहिती मावळ तालुक्यात वार्यासारखी पसरली. त्यामुळे गावातीलच नव्हे तर मावळ तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नातेवाईकही फोन करून अथवा प्रत्यक्ष घरी येऊन बनताबाई यांचेे अभिनंदन करीत आहेत. नायगाव ग्रामस्थांच्या वतीनेही बनताबाई यांचे अभिनंदन करण्यात आले.