काश्मीरमधील दळणवळणावरील निर्बंध उठविण्याची अमेरिकी काँग्रेस समितीची विनंती
वॉशिंग्टन : भारताने काश्मीरमध्ये दळणवळणावर घातलेल्या र्निबधांचा तेथील जनतेच्या आयुष्यावर आणि कल्याणावर विपरीत परिणाम झाला आहे, असे अमेरिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या काँग्रेस समितीने म्हटले आहे. त्यामुळे खोऱ्यात दोन महिन्यांहून अधिक काळ घालण्यात आलेले हे निर्बंध उठावावे, अशी विनंती या समितीने सरकारला केली आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये ५ ऑगस्ट रोजी निर्बंध लादले. त्यानंतर मुख्य बाजारपेठा बंद असल्याने आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्था बंद असल्याने जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ काश्मीरमधील सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हंडवारा आणि कुपवाडा वगळता काश्मीरमधील भ्रमणध्वनी सेवा अद्यापही स्थगितच आहेत तर ५ ऑगस्टपासून इंटरनेट सेवा बंद आहे. भारताने दळणवळणावर घातलेल्या र्निबधांचा काश्मिरींच्या आयुष्यावर आणि कल्याणावर दररोज विपरीत परिणाम होत आहे, असे अमेरिकेच्या महत्त्वाच्या समितीने सोमवारी ट्वीट केले. भारताने हे निर्बंध उठविण्याची वेळ आली असून काश्मिरींना अन्य भारतीय नागरिकांप्रमाणे हक्क व अधिकार दिले पाहिजेत, असेही ट्वीटमध्ये म्हटले आहे.