Budget Session 2020 : पुण्यातील पाणी व्यवस्थेसाठी पर्याय उभारणार : जलसंपदा मंत्री जयंत पाटील
पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी
राज्यातील कालव्यांच्या जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जातात. त्यामुळे कालवे स्थिरता गमावतात. येत्या काळात पुण्यातील पाणी व्यवस्थेसाठी पर्याय उभा करण्याचा महाराष्ट्र आघाडी विकास सरकारचा मानस आहे, असे मत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि अन्य विधानसभा सदस्यांनी पुण्यातील बेबी कालवा फुटल्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत मनपाचे एसटीपी प्रमुख व मुख्य अभियंत्यांशी चर्चा करून त्वरित कार्यान्वित होण्याचे निर्देश दिल्याचे सांगत ना. जयंत पाटील यांनी हे जर झाले तर दौंड-इंदापूर परिसरालाही पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होईल.
जलसिंचन विभागाच्या मालकीच्या जमिनी या शाळा, रस्ते तसेच विविध लोकोपयोगी कामांसाठी मागितल्या जातात. पण भविष्यात उपसा सिंचनासाठी अपारंपरिक उर्जा स्त्रोत उभे करावे लागतील. त्यासाठी जलसंपदा विभागाच्या या जमिनी उपयोगी पडतील. त्यामुळे अशा जमिनी देणे शासनाला योग्य वाटत नाही. येत्या काळात अशा जमिनी दिल्या जाणार नाहीत, तसेच ज्या जमिनी दिल्या आहेत त्यांचीही उपयोगिकता पाहून गरज असेल तर परत घेतल्या जातील, असे ना. जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.