अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेसाठी अशी असेल टीम इंडिया? पाहा संभाव्य प्लेइंग-११
13 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका; श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा, वैभव सूर्यवंशीसह युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने 1-0 असा विजय मिळवला. आता भारतीय संघ टी-20 क्रिकेटच्या मैदानात उतरणार असून अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
मालिकेतील पहिला सामना 13 सप्टेंबरला, दुसरा सामना 15 सप्टेंबरला आणि तिसरा सामना 17 सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात युवा तसेच अनुभवी खेळाडूंचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य प्लेइंग-11 कशी असेल, याची उत्सुकता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे.
सलामीसाठी युवा फलंदाजांना संधी?
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि वैभव सूर्यवंशी यांच्यापैकी खेळाडूंना डावाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी दिली जाऊ शकते.
मधल्या फळीत कोण?
मधल्या फळीत कर्णधार श्रेयस अय्यर, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू शिवम दुबेचाही संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यामुळे भारतीय संघाची फलंदाजीची फळी युवा आणि अनुभवी खेळाडूंच्या मिश्रणाने सजण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा; म्हणाले, ‘हे तर आपलेच लोक’
गोलंदाजांमध्ये कोणाला संधी?
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांच्यावर सोपवली जाऊ शकते. वेगवान गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, मयांक यादव आणि प्रिन्स यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
अशी असू शकते भारताची टी-20 टीम
वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसिध कृष्णा आणि मयांक यादव.
अफगाणिस्तानविरुद्धची मालिका भारतीय संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या काही टी-20 मालिकांमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यात भारतीय संघाला अपयश आले आहे. त्यामुळे या मालिकेत युवा खेळाडूंना संधी देत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





