राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनच्या दौऱ्यावर जाणार; सीमावादावर उच्चस्तरीय चर्चेची शक्यता

Ajit Doval | भारत आणि चीन यांच्यातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बीजिंग दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांमधील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष प्रतिनिधींच्या (Special Representatives) चर्चेच्या २५ व्या फेरीत अजित डोवाल सहभागी होणार असून, ते चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.
भारत आणि चीनमधील सीमाप्रश्न शांततापूर्ण आणि राजनैतिक मार्गाने सोडवण्यासाठी ‘विशेष प्रतिनिधी’ यंत्रणा स्थापन करण्यात आली होती. अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे दोन्ही देशांचे अधिकृत विशेष प्रतिनिधी आहेत. मंगळवारी होणाऱ्या या २५ व्या फेरीतील बैठकीत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थिती, सैन्य माघारीची पुढील प्रक्रिया आणि सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
गलवान संघर्षानंतर संबंध सुधारण्याचे संकेत
जून २०२० मध्ये पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. दोन्ही देशांनी सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले होते; तसेच भारतात चिनी गुंतवणुकीवर निर्बंध, आयातीची कडक तपासणी आणि थेट विमान उड्डाणे बंद करण्यात आली होती. मात्र, सातत्यपूर्ण लष्करी व राजनैतिक चर्चेच्या फेऱ्यांनंतर अलिकडच्या काळात तणाव कमी झाला असून उभय देशांमधील संबंध पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याची शक्यता
या उच्चस्तरीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग लवकरच भारताचा दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवी दिल्लीत १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘ब्रिक्स’ (BRICS) शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी शी जिनपिंग भारतात येण्याची शक्यता असून, या दौऱ्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.





