यशस्वी जैस्वाल अडचणीत; श्रीलंकन गोलंदाजासोबतच्या झटापटीमुळे Level-4 कारवाईची टांगती तलवार
मैदानावरील वादानंतर मॅच रेफरींच्या निर्णयाकडे लक्ष; दोषी ठरल्यास कसोटी सामन्यांच्या बंदीची शक्यता

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि श्रीलंकेचा गोलंदाज असिथा फर्नांडो यांच्यात झालेल्या वादाला गंभीर वळण मिळाले आहे. ४५ धावांवर बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असताना जैस्वाल आणि फर्नांडो यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक झटापट झाल्याने आता या प्रकरणावर आयसीसीच्या आचारसंहितेनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे.
बाद झाल्यानंतर मैदानावर नेमकं काय घडलं?
डावाच्या १७व्या षटकात असिथा फर्नांडोने जैस्वालला ४५ धावांवर बाद केले. त्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असताना फर्नांडोने काहीतरी शेरेबाजी केल्याचे सांगितले जात आहे. त्यावर जैस्वाल मागे फिरला आणि दोघांमध्ये वाद झाला. परिस्थिती चिघळल्यानंतर जैस्वालने हेल्मेटने फर्नांडोच्या हेल्मेटला धडक दिल्याचे समोर आले.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वा आणि पंचांनी मध्यस्थी करत दोन्ही खेळाडूंना दूर केले.
हेही वाचा – सुट्टे खाद्यतेल विक्री बंदीवरून व्यापारी आक्रमक; तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार
‘भावनेच्या भरात घटना घडली’
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. फर्नांडोकडून काहीतरी शेरेबाजी झाली असण्याची शक्यता व्यक्त करत, घटना सामन्यातील तणावपूर्ण वातावरणात आणि भावनेच्या भरात घडल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जैस्वालने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या इतक्या जवळ जाणे टाळायला हवे होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
श्रीलंकेचे गोलंदाजी प्रशिक्षक रायन वॅन नीकर्क यांनीही खेळाडूंकडून भावनेच्या भरात काही शब्द बाहेर पडत असल्याचे सांगितले. या प्रकरणात पुढील कारवाईचा निर्णय मॅच रेफरी घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Level-4 कारवाईची शक्यता
विरोधी खेळाडूसोबत शारीरिक संपर्क झाल्यामुळे जैस्वालविरोधात आयसीसी आचारसंहितेअंतर्गत कारवाई होऊ शकते. संबंधित नियमांनुसार शारीरिक हल्ल्याची कृती गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येऊ शकते.
मॅच रेफरींनी जैस्वालला दोषी ठरवल्यास त्याच्यावर सामन्यांची बंदी किंवा अन्य कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी कसोटी मालिकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
मॅच रेफरींच्या निर्णयाकडे लक्ष
या संपूर्ण प्रकरणावर मॅच रेफरी काय निर्णय घेतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जैस्वालवरील संभाव्य कारवाईमुळे आगामी सामन्यांमध्ये त्याच्या उपलब्धतेबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे.





