भारतीय फिरकीपटू कर्ण शर्माची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!

Karn Sharma | भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेला आणि देशांतर्गत क्रिकेटसह आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारा ३८ वर्षीय लेग-स्पिनर कर्ण शर्मा याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅट्समधून निवृत्ती जाहीर केली आहे. युपी टी-२० लीगदरम्यान त्याने हा निर्णय जाहीर केला असून, ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’नुसार तो २५ ऑगस्ट रोजी आपला शेवटचा सामना खेळणार आहे.
कर्ण शर्माने भारतासाठी २०१४ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळाली नसली तरी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय छाप पाडली. त्याने भारतासाठी १ कसोटी, २ एकदिवसीय आणि १ टी-२० असे एकूण ४ आंतरराष्ट्रीय सामने खेळत ५ बळी मिळवले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रथम श्रेणी (First-Class), लिस्ट ‘ए’ आणि टी-२० मिळून एकूण ५५१ बळी पटकावले आहेत. यात ९७ प्रथम श्रेणी सामन्यांमधील २७० बळी, १२३ लिस्ट ‘ए’ सामन्यांमधील १५३ बळी आणि १९१ टी-२० सामन्यांमधील १६८ बळींचा समावेश आहे.
हेही वाचा
महाराष्ट्रात खासगी कोचिंग क्लासेससाठी कडक नियमांचा मसुदा जाहीर; ५० लाखांपर्यंत दंडाची तरतूद
आयपीएलमधील अनोखा विक्रम आणि तीन विजेती पदे
आयपीएलमध्ये कर्ण शर्माने सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या प्रमुख संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर सलग तीन वर्षे वेगवेगळ्या संघांकडून आयपीएल विजेतेपद पटकावण्याचा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. त्याने २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद, २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स आणि २०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला. आयपीएल २०२५ मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून अखेरचा आयपीएल सामना खेळला होता.
प्रशिक्षक पदासाठी उपलब्ध राहण्याचे संकेत
आपल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत बोलताना कर्ण शर्माने कुटुंब, बीसीसीआय (BCCI), रेल्वे, युपीसीए (UPCA), आंध्र प्रदेश आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले. क्रिकेटच्या या प्रदीर्घ प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचा आपण ऋणी असून, यापुढील काळात प्रशिक्षकपद आणि क्रिकेटशी संबंधित इतर जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी उपलब्ध असेन, असे त्याने स्पष्ट केले.




