श्रीलंकेच्या संघात मोठे बदल; भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी दोन खेळाडूंची निवड
कुसल मेंडिस आणि दिनेश चंदिमल बाहेर; कामिल मिशारा आणि साहन अरच्चिगेला संधी

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेवर १६५ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या कसोटीपूर्वी श्रीलंका संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.
कुसल मेंडिस आणि दिनेश चंदिमल यांच्या जागी कामिल मिशारा आणि साहन अरच्चिगे यांची श्रीलंकेच्या संघात निवड करण्यात आली आहे. त्यामुळे साहन अरच्चिगेला प्रथमच श्रीलंकेच्या कसोटी संघातून खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
लंका प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेदरम्यान कुसल मेंडिसला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्याची पहिल्या कसोटीसाठी संघात निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला सामना खेळता आला नव्हता. त्याच्या जागी निरोशन डिकवेलाची बॅकअप यष्टीरक्षक म्हणून निवड करण्यात आली होती.
हेही वाचा – सोमालियाच्या किनाऱ्यावर जहाजाचं अपहरण; ६ भारतीयांसह १० क्रू मेंबर्स समुद्री चाचांच्या ताब्यात
गॉल कसोटीच्या चौथ्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना दिनेश चंदिमलच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीच्या उर्वरित भागातून बाहेर पडावे लागले. आता त्याच्या जागी साहन अरच्चिगेला संधी देण्यात आली आहे.
साहनने यापूर्वी श्रीलंका ‘अ’ संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला प्रथमच वरिष्ठ कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. तर कामिल मिशाराने लंका प्रीमियर लीगमध्ये प्रभावी कामगिरी करत निवड समितीचे लक्ष वेधले होते.
गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करताना ४६२ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलने १६७, तर केएल राहुलने ८२ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव २८४ धावांवर संपुष्टात आला.
भारताचा दुसरा डाव १९३ धावांवर आटोपल्यानंतर श्रीलंकेसमोर विजयासाठी ३७२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. मात्र श्रीलंकेचा डाव २०६ धावांवर संपला आणि भारताने सामना १६५ धावांनी जिंकला.
आता कोलंबोतील दुसरी कसोटी जिंकून मालिका २-० अशी खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल, तर श्रीलंकेसमोर मालिका बरोबरीत आणण्याचे आव्हान असणार आहे.





