हिंजवडी वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकांने नियम पाळावेत
पोलीस आयुक्त आर. के. पद्दनाभन यांनी साधला आयटीयन्सशी संवाद
पिंपरी ( महा ई न्यूज ) – हिंजवडीतील आयटी कंपन्यातील सायबर सुरक्षेसह वाहतूक देखील महत्वाची आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकाने नियमाचे पालन करावे, तरच वाहतूक कोंडीचा प्रश्न आटोक्यात येईल, असे मत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त आर के पद्मनाभन यांनी व्यक्त केले.
हिंजवडी मधील हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनच्या सभागृहात आयुक्तांनी हिंजवडी मधील आयटीयन्सशी संवाद साधला. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे, सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयुक्त म्हणाले की, समस्या भरपूर असतात. पण त्या योग्य ठिकाणी मांडायला हव्यात. समूहात समस्या विचारल्यास कोणीही समस्या सांगत नाही. पण वैयक्तिक विचारल्यास प्रत्येकजण समस्या सांगतो. आपल्या अडचणी एकमेकांशी शेअर करा. जबाबदा-या ओळखा आणि नियम पाळा, त्यामुळे प्रशासनातही सुधारणा होतात. हिंजवडी सध्या वाहतुकीच्या समस्येने ग्रासली आहे. तिला त्यातून सोडविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे महत्वाचे आहे.”
अप्पर आयुक्त रानडे म्हणाले की, “पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला सध्या मनुष्यबळाची सर्वात मोठी अडचण आहे. उपलब्ध मनुष्यबळामध्ये चांगले पोलिसिंग करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलीस आपल्या पातळीवर प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील त्यासाठी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे.”