शास्तीकर माफीच्या आंदोलनात स्थानिक आमदार, खासदारांना ‘नो एॅन्ट्री’
- मानवी साखळीद्वारे महापालिका मुख्यालयास घालणार घेराव
- 21 फेब्रुवारीला महापालिकेवर विराट मोर्चा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवडकरांना स्थानिक आमदार, खासदारांनी शास्तीकर, अनधिकृत बांधकामे, रेडझोन, रिंगरोड यासह अनेक प्रश्नावरुन राजकारण करुन स्वताःची पोळी पाजून घेतली. सत्ताधारी भाजपाने खोटी आश्वासने देवून लोकांची फसवणुक केल्याने आजही सर्व प्रश्न प्रलंबित असून आमदार,खासदारांना आंदोलनात नो एॅन्ट्री असणार आहे, असा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी दिला. दरम्यान, या प्रश्नावरुन सत्ताधारी भाजप विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्रित आले असून सोमवारी (दि.11) दुपारी 3 वाजता मानवी साखळीव्दारे महापालिका मुख्यालयास घेराव घालणार आहे.
या आंदोलनात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे तसेच विविध सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहरप्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना गटनेते राहूल कलाटे म्हणाले की, शास्तीकरांचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनाही रस्त्यावर उतरले पाहिजे. या प्रश्नांमुळे नागरिकांच्या मिळकतींना जप्तीच्या नोटीस आल्या आहेत. नागरिकांनी शास्तीकर सोडून मूळ कर भरावा, असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर म्हणाले की, भाजपाने शास्तीकर माफ केल्याचा खोटा जीआर काढला. त्या जीआरची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. महापालिकेने शास्तीकरांची सक्त वसुली चालू केली असून नागरिकांवर खुप मोठे दडपण आले आहे. असे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले की, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर हे भाजपचे घरगडी असल्यागत वागत आहेत. शिवाय ते पक्षाच्या दावणीला बांधल्यामुळे लोकांच्या हिताची गोष्ट त्यांना दिसत नाही. भाजपने खोटी आश्वासने देवून सत्ता लाटली परंतू, त्यानंतर लोकांना गाजरे दाखवून फसवित चालले आहेत. जप्तीच्या नोटीस काढल्याने लोकांचा उद्रेक झाला असून भाजपवर लोकांचा आक्रोश काढला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय विरोधकांचा 11 तारखेला मानवी साखळी आंदोलन आणि 21 फेब्रुवारीला महामोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घेराव आंदोलनामध्ये शहरातील सामाजिक संस्था सर्व विरोधी राजकीय पक्ष व नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.