‘विद्यार्थ्यांना हवी होती JEE-NEETवर चर्चा, मोदींनी केली खेळण्यांवर चर्चा’ राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमाद्वारे अनेक विषयांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की ही वेळ स्थानिक खेळण्याच्या वस्तूंसाठी आवाज बुलंद करण्याची आहे. पंतप्रधानांनी स्थानिक खेळण्याच्या समृद्ध भारतीय परंपरेची विस्तृत चर्चा करत रविवारी स्टार्ट-अप आणि नव्या उद्योजकांना खेळण्यांच्या उद्योगाशी मोठ्या प्रमाणावर जोडून घेण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांच्या या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की जेईई आणि नीट परीक्षांवर चर्चा करण्याऐवजी पंतप्रधानांनी खेळण्यांवर चर्चा केली.
राहुल यांनी केले ट्वीट
राहुल गांधींनी ट्वीट करून म्हटले, “JEE आणि NEETच्या परीक्षार्थ्यांना पंतप्रधानांकडून ‘परीक्षा पे चर्चा’ अपेक्षित होती, पण पंतप्रधानांनी ‘खेळण्यांवर चर्चा’ केली.” यासोबतच राहुल यांनी हॅशटॅग दिला- मन की बात नाही, विद्यार्थ्यांची बात. राहुल गांधी यांनी याआधीही कोरोनाच्या संकटाच्या काळात जेईई आणि नीटच्या परीक्षा घेण्यास विरोध दर्शवला होता. सरकारच्या निर्णयाचा विरोध करताना शुक्रवारी त्यांनी म्हटले होते की सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करून सहमतीने काही उपाय काढायला हवा.