रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करा, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची मागणी
मुंबई – भाजपाचे जेष्ट नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी एका सभेत मुस्लिम समाजाला संबोधित करताना, ‘खुशाल गो-हत्या करा, मी असेपर्यंत कोणी तुम्हाला अडवणार नाही’, असे विधान केले होते. त्यावर आता प्रतिक्रीया येणे सुरू झाल्या आहेत. ”कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी”, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.
“केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही यामध्ये लक्ष घालून अशाप्रकारच्या मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी” अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. एका बाजूला गोहत्येच्या नावावर मुस्लिम समाजाच्या विरोधात मॉबलिचिंगचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे मतांसाठी गोहत्या करा, असं मुस्लिम समाजाच्या लोकांना सांगायचं, असे मंत्री केंद्रात असतील तर देशात काय सुरु आहे हे लक्षात येते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
काय म्हणाले होते रावसाहेब दानवे
जालना जिल्ह्यातील भोकरदन मतदार संघातून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. आपल्या मुलाच्या प्रचारासाठी 19 ऑक्टोबरला रावसाहेबांनी भोकरदन येथील कठोरा बाजारात मुस्लिम समाजातील नागरिकांना संबोधित करताना ‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा, तुम्हाला कोणी मनाई करणार नाही’, असे वक्तव्य केले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हाटरल होताच, दानवे यांच्यावर सर्च स्तरातून टीका होत आहे.