मुंंबईच्या समुद्र किनार्यात 4.42 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या; किनारालगतच्या घरापर्यंत पोहचलं पाणी
मुंंबई शहरात आज सकाळपासुन जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी 11 वाजुन 39 मिनिटांनी मुंंबईच्या समुद्र किनार्यात 4.42 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. आयएमडी आणि बीएमसी तर्फे या भरतीच्या वेळेबाबत अगोदरच माहिती देण्यात आली होती. मात्र या भरतीच्या वेळी वांद्रे येथील किनारालगतच्या घरापर्यंत पाणी पोहचल्याचे समजत आहे. आयएमडीच्या (IMD) माहितीनुसार पुढील 48 तास मुंंबई मध्ये जोरदार पाऊस कायम राहणार आहे. तसेच रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढु शकणार आहे.
तर, दुसरीकडे मुंंबई, ठाणे, कोकण भागासहितच मध्य महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापुर या भागात सुद्धा पावसाने गेले काही दिवस जोर धरला आहे. परिणामी सांगलीमध्ये कृष्णा नदी धोक्याची पातळी गाठण्याच्या मार्गावर आहे. तर, कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे, या नदी पात्रा लगतच्या भागातील अनेक घरात पाणी शिरल्याने शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
दरम्यान, हवामान खात्याचे उपमहासंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये येत्या पाच दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, मराठवाडा व विदर्भ येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः सोलापुर,सांगली, लातुर, उस्मानाबाद, जळगाव, सिंधुदुर्ग या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे