महाविकास आघाडीचं सरकार ‘शिवछत्रपतीं’चे नव्हे… तर ‘औरंगजेब’ला अभिप्रेत असणारं
माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवारांची घणाघाती टिका; महिला सुरक्षावरुन महासभा भरकटली
महापालिका महासभा 26 फेब्रुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब, महापाैराच्या सुचना
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
देशासह राज्यात मुली व महिलांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. समाजात महिला-मुलींची सुरक्षा धोक्यात आली असून पीडितांना न्याय मिळण्यासाठी आरोपींना कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी महापालिका महासभेत आज (गुरुवारी) सर्वपक्षीय नगरसदस्यांनी केली. मात्र, सत्ताधारी भाजप – विरोधी राष्ट्रवादी-शिवसेना सदस्यांनी महिला सुरक्षा मुद्दावरुन पक्षीय पातळीवर एकमेकांवर चिखलफेक केली. त्यामुळे संवेदनशिल मुद्यावरुन महिला सुरक्षेची चर्चा भरकटली.
दरम्यान, भाजप सदस्यांनी महाविकास आघाडीला तर विरोधी राष्ट्रवादी-शिवसेनेने केंद्र सरकारला जबाबदार धरत एकमेकांवर बेछूट आरोप केले. त्यात हे महाविकास आघाडीचे सरकार शिवछत्रपतींना नव्हे तर औरंगजेबला अभिप्रेत असल्याची टिका माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली. त्यावरुन सत्ताधारी-विरोधी सदस्यांमधून तु-तु मै-मै होण्यास सुरुवात झाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेची आज फेब्रुवारी (दि.20) महिन्याची महासभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. या सभेची सुरुवात महिलांची सुरक्षा आणि उपाय योजनांवर नगरसदस्यांनी चर्चस सुरुवात केली. नगरसदस्या प्रियंका बारसे यांनी हिंगणघाटसह अन्य घटनेची पार्श्वभूमी सांगून पेट्रोल अॅसीड सह उपलब्ध झाल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा किती गंभीर बनल्याचे सांगितले. तर सुजाता पालांडे, माया बारणे यांनीही महिला सुरक्षेचा प्रश्नावरुन थेट राज्य सरकारला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. शहरातील महिला-मुलींच्या समस्या सोडवण्याची मागणी केली.
राष्ट्रवादीच्या वैशाली घोडेकर यांनी महिला अत्याचार प्रश्नावरुन केंद्र सरकारवर टीका करीत निर्भया प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा न झाल्याने केंद्रीय गृहमंत्र्याचा निषेध व्यक्त केला. तर बाळासो ओव्हाळ यांनी भारतीय संविधान धोक्यात आल्याचे सांगत केंद्रावर टीका केली. पण महिला सुरक्षावरुन थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा, असे म्हटले. तर राष्ट्रवादीच्या मंगला कदम यांनी महिलाच्या संवेदनशिल विषयावर बोलताना प्रत्येकाने तारतम्य बाळगले पाहिजे. तसेच महिला सुरक्षेचे विषयांतर करुन नेत्यांचे राजीनामे मागताना खातं कोणाकडे आहे. हे आधी समजून घेण्याचा सल्ला दिला.
भाजप नगरसदस्या आशा शेंडगे, सीमा सावळे यांनीही महिला सुरक्षाच्या मुद्द्यावर थेट राज्य सरकारला जबाबदार धरत त्यांच्या निष्क्रीय कारभाराचे वाभाडे काढले. त्यावरुन राष्ट्रवादीचे दत्ता साने यांनी महाविकास आघाडीचे सरकार कसे कामकाज करतेय, आणि भाजप सरकारने काय केलंय, या दोन्ही सरकारची तुलनात्मक गोष्टी सांगून महाविकास आघाडीने दिशा कायद्याचे लवकरच लागू करण्याचे सांगितले.
माजी पक्षनेते एकनाथ पवार यांनी तीन महिन्यात राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. आताचे महाविकास आघाडीचे सरकार हे शिवछत्रपतींच्या विचारांवर आणि त्यांना अभिप्रेत असणारे नाही. तर औरंगजेबाला अभिप्रेत असणारे आहे, अशी बोचरी टीका करत या सरकारचा जाहीर निषेध करतो, असं सांगितले. तर शिवसेनेचे राहूल कलाटे यांनी महिलांच्या प्रश्नावर चर्चा करताना प्रत्येकाने आपआपला पक्ष डोक्यात ठेवून चर्चा करु नये. महिला गंभीर प्रश्नावर चर्चा करताना प्रत्येकजण राजकारण करतो आहे. ही बाब खरंच दुदैवी आहे. शाळांच्या खरेदीपेक्षा त्यांना स्वालंबनाचे, प्रशिक्षणाचे धडे देणारे विषय करण्याची सुचना केली.
अजित गव्हाणे म्हणाले की, महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यांचे विषयांतर होत असून महासभा चालविताना पक्षीय राजकारण होत आहे. सभागृहाचा दर्जा घसरु लागला आहे. चुकीचे पायंडे पाडून सभागृह चालविले जात आहे. त्यामुळे आयुक्तासाहेब आधी तुमच्या अधिका-यांना स्वसंरक्षण आहे का? ते बघा असा सल्ला दिला. नाना काटे म्हणाले की, महापाैर तुम्ही शहराच्या असून पक्षाच्या नव्हेत. तुम्ही सभागृहात दुजाभावाची वागणूक देवू नका. पक्षीय राजकारण करताना तुमच्या सदस्यांना खाली बसण्याच्या सुचना तुम्ही करायला हव्या होत्या. त्यात मी तुम्हाला शिकवायला आलो नाही, मुळात मी आडाणी विद्यार्थी घेत नाही, असा टोमणा सीमा सावळे यांना लगावला.
पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, महिलाच्या संवेदनशिल विषयावरुन आम्हाला राजकारण करायचे नाही. महिलांची सुरक्षा व उपाययोजना यावर महिला नगरसदस्यांनी पोटतिडकीने विषय मांडला आहे. महिला-मुलींची सुरक्षा महत्वांची असून त्याकरिता राज्य व केंद्र सरकारला कडक पावले उचलण्याबाबत ठराव करण्याची मागणी केली.