भारतीय पुरुष व महिला तिरंदाजी संघ अंतिम फेरीत, 2 पदक निश्चीत
जकार्ता: भारताच्या महिला व पुरुष तिरंदाजांनी कम्पाऊंड सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिलांनी उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंना कडवी टक्कर दिली. ज्योती वेन्नम, मुस्कान किरार आणि मधुमिता कुमारी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने 225-222 अशा फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुवर्णपदकाच्या लढतीत त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे.
भारताच्या पुरुष तिरंदाजांनी कम्पाऊंड गटाच्या सांघिक गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांनी चायनीज तैपेईचे आव्हान 230-227 असे मोडून काढले. रजत चौहान, अमन सैनी आणि अभिषेक वर्मा यांचा भारतीय संघात समावेश आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपाइन्सचा 227-226 अशा अटीतटीच्या लढतीत पराभव केला होता. आता भारतीय संघाचा सुवर्णपदकासाठीचा सामना कोरियाच्या संघासोबत होणार आहे.
आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना केवळ एकच सुवर्णपदक पटकावता आलेले आहे, तर देशाच्या नावावर दोन रौप्य व पाच कांस्यपदकं आहेत. 2014च्या इंचॉंन आशियाई स्पर्धेत पुरुष कम्पाऊंड संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्या संघात रजत चौहान, संदीप कुमार आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश होता. त्रिशा देब, पुर्वषा शेंडे व ज्योती वेन्नम यांचा समावेश असलेल्या महिला संघाला 2014च्या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.