प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्याआधीच मद्यविक्रीला सुरवात
नागपूर | महाईन्यूज |
कारखान्यात मद्यनिर्मिती झाल्यानंतर ते बाजारात विकण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल अनेकदा विलंबाने मिळतो. तो येईपर्यंतच्या काळात अनेकदा संबंधित बॅचच्या मद्याची बाजारात विक्रीसुद्धा झालेली असते, अशी माहिती मिळतेय.
२०० ते २५० मद्यनिर्मिती कारखाने आहेत. मद्यनिर्मिती झाल्यावर त्याला बॅच क्रमांक देऊन तीव्रता तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाते. नियमाप्रमाणे तेथून अहवाल प्राप्त झाल्यावरच मद्य बाजारात विक्रीसाठी जाणे अपेक्षित आहे. परंतु अनेकदा हा अहवाल येण्याची वाट बघितली जात नाही. तो येईपर्यंत संबंधित मद्याची विक्री झालेली असते, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही बाब गंभीर असल्यामुळे ग्राहकांना निकृष्ट दर्जाचे मद्य मिळण्याचा धोका आहे.
महाराष्ट्रात विभागपातळीवर शासकीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा आहेत. याशिवाय मुंबईत हाफकिन्स इन्स्टिटय़ूटमध्ये ही तपासणीची सोय आहे. तसेच शासनाने पुण्यातील वसंतदादा श्युगर इन्स्टिटय़ूट या खासगी संस्थेलाही रासायनिक पृथक्करणासाठी प्राधिकृत केले आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून विविध कारखान्यांचे नमुने एकत्रित करून ते दर महिन्याला प्रयोगशाळांकडे पाठवले जाते. ही संख्या मोठी असते. एका कारखान्यात सरासरी एक महिन्याला १०० ते १२५ नमुने घेतले जातात. याशिवाय शासकीय प्रयोगशाळांमध्ये विविध प्रकारच्या २५ तपासण्यांचे काम होते. त्यामुळे काही वेळा तपासणी अहवाल कारखान्यांना पाठवण्यास विलंब होतो.