पर्यावरण रक्षणासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे
- पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेत डॉ. हर्षवर्धन यांचे आवाहन
नवी दिल्ली – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व भागधारकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेला ते आज संबोधित करत होते. “बीट प्लॅस्टीक पोल्यूशन’ हे केवळ एक घोषवाक्य राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दररोज 25 हजार टन प्लॅस्टीकचा कचरा निर्माण होतो. प्लॅस्टीकमुळे पर्यावरणाला वाढता धोका लक्षात घेऊन तंत्रज्ञान, निधी आणि संशोधनाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती होऊ शकते.
मात्र त्यासाठी समर्पित प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक राज्यातील पर्यावरण मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील नागरिकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी सजग करण्यासाठी लहान सामाजिक चळवळी उभाराव्यात आणि एकत्रित प्रयत्न करावेत असे आवाहन हर्षवर्धन यांनी केले.