राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार आजपासून सुरु होणार!
मुंबई | राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार आजपासून पुन्हा सुरु होणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते.
मात्र अनलॉक 5 मध्ये राज्य सरकारने नियम आणि अटींसह हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यास परवानगी दिली. यासाठी राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार आणि हॉटेल पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावलीही जाहीर केली आहे.
आजपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध रेस्टॉरंटस् आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे एसओपीची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे रेस्टॉरंट (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेट्स, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबई महापालिकेने हॉटेल मालकांना जारी केलेली नियमावली
दरम्यान हॉटेल्स, रेस्टरंट्स आणि बार सुरु करण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीसोबतच मुंबई महापालिकेने इतरही काही नियम जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल मालकांना राज्य सरकारच्या नियमावलीसोबतच मुंबई महापालिकेच्या नियमांचंही पालन करावं लागणार आहे.
- काय आहेत मुंबई महापालिकेचे नियम?
- मुंबईतले हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री-बुकींग आवश्यक
- ठरावीक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही
- दोन टेबलमध्ये 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक
- टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता होणं गरजेचं आहे
- हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकिय चाचणी आणि कोविड टेस्ट करणंही गरजेचं असेल