‘…नाहीतर मुंबईत येऊन ‘मातोश्री’च्या दारात आंदोलन करू!’
पुणे | महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊन लागू आहे. अशातच डिजेबंदीमुळे साऊंड सिस्टिम आणि लाईट मालकांवर व कामगार यांच्यावर मागील 5 महिन्यापासून उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने साऊंड व लाईट मालकांसाठी आर्थिक पॅकेज द्यावे, कर्ज माफ करावे, डिजे वाजवण्यास नियमात परवानगी द्यावी, अशी मागणी डिजे मालकांनी केली आहे.
शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास महाराष्ट्रात जनआंदोलन पुकारुन रस्त्यावर उतरू, असा इशाराही छावा क्रांतिवीर सेना व साऊंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनने दिला आहे.महाराष्ट्र राज्य छावा क्रांतिवीर संघटना व पुणे जिल्हा साउंड सिस्टिम आणि लाईट असोसिएशनच्या जुन्नर व आंबेगाव तालुका कमिटीचा मेळावा आंबेगाव तालुक्यातील एकलहरे इथे रविवारी पार पडला. यावेळी अध्यक्ष करण गायकर, केंद्रिय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील, संपर्कप्रमुख क्रांतीनाना मळेगावकर, सह्याद्री मळेगावकर, पुणे जिल्हा साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गणेश काळभोर, उपाध्यक्ष अनिल पाटील, खजिनदार सागर सुतार, साई उंद्रे, सचिव अमोल आमले, सल्लागार अॅड.सुनिल व ओव्हाळ उपस्थित होते.
‘साऊंड सिस्टिम व लाईट असोसिएशनच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मुंबईत ‘मातोश्री’च्या दारात आंदोलन करू. मागण्या मान्य करणे शक्य नसेल तर सरकारने साऊंड मालकांचे साहित्य विकत घेऊन कर्ज माफ करावे’ असा इशारा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी सरकारला दिला.