नागभीडमध्ये वाघानंतर आता रानडुक्कराची दहशत
नागभीड | चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीडमध्ये वाघानंतर आता रानडुक्कराची दहशत निर्माण झाली आहे. नागरी वस्तींवर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. नागभीड नगपरिषदेअंतर्गत येणाऱ्या नवखळा येथील शिवनगर टोली परिसरात काल सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास काम करत असलेल्या नागरिकांवर रानडुक्कराने गावात प्रवेश करून हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जखमी झाले.
वन्यप्राणी गावात शिरून हल्ले करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ईश्वर मनिराम जांभुळे (70), जयदेव अर्जुन जांभुळे (65), मुखरू कोंडू मांढरे (65) अशी जखमींची नावे आहेत. त्यानंतर जखमींना तत्काळ ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील ईश्वर मनिराम जांभुळे हे गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले. नागभीड तालुक्यातील ही सहा दिवसांतील तिसरी घटना आहे.
नागभीड नगरपरिषदेअंतर्गत येणाऱ्या तुकूम येथे शेतात काम करणाऱ्या 45 वर्षीय व्यक्तीस वाघाने हल्ला करून ठार केले. दोन दिवसांपूर्वी नागभीड नारपरिषदेअंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणी गावात शिरून पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यास गंभीर जखमी करीत शेतातील झोपडीत मुक्काम ठोकला होता. अखेर अथक प्रयत्नांनंतर वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.