..तर मनेका गांधींनीही राजीनामा द्यावा : मुनगंटीवार
मुंबई – यवतमाळमधील अवनी या वाघिणीला वन विभागाने ठार केल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असे केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचे म्हणणे असेल तर मग देशातील महिला-बालमृत्यूची जबाबदारी स्वीकारून मेनका गांधी यांनाही राजीनामा द्यावा, असे प्रत्युत्तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
मनेका गांधी यांनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, असे पत्रकारांनी विचारले असता मी मंत्रिपदावर नाही, तर पक्ष्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या वाघिणीला मारण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार वन विभागाने तिला पकडण्याची कारवाई सुरू केली होती. त्यात तिचा मृत्यू झाला. याची नैतिक जबाबदारी माझी असेल तर देशात ठिकठिकाणी महिला व बालमृत्यू होत आहेत, कुपोषण होत आहे याची नैतिक जबाबदारी घेऊन मनेका गांधी यांना राजीनामा द्यावा लागेल, असे प्रत्युत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. अवनी मृत्यूप्रकरणात चौकशीचे संकेतही त्यांनी दिले.मनेका
उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी वाघाला ठार करण्यात आले त्या वेळी कोणताही गोंधळ झाला नव्हता, याकडेही त्यांनी लक्ष्य वेधले.
शिवसेना आक्रमक : अवनी मृत्यूप्रकरणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन मुनगंटीवार यांना जाब विचारावा, असे आदेश शिवसेना पक्षश्रेष्ठींनी मंत्र्यांना दिल्याचे समजते.