कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुंबई पालिकेचा प्लान, नवा रुग्ण सापडल्यास इमारत होणार सील
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाला तेव्हा रुग्ण सापडल्यावर तत्काळी इमारत वा चाळ सील केली जायची. आताही पुन्हा हाच नियम लागू करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. बोरिवली, कांदिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तिथं एकजरी रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत वा विंग सील केली जाणार आहे. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना असा निर्णय झाल्याने नागरिकांकडून या नियमाला विरोध होण्याची शक्या आहे.
मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील दुकानदार, किराणा दुकाने, औषधांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोना संक्रमित असलेल्या स्थानिकांना अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी आणि औषधे आणण्यासाठी त्यांच्या विभागातून बाहेर पडता आलेले नाही. त्यामुळेच अँटिजेन टेस्ट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हायरिस्क कॉन्टॅक्टमधील रुग्णांच्या संख्येत २० ते ४० टक्के वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. याचा अर्थ जे लोक सोसायटीमध्ये राहत आहेत ते लोक त्यांच्या घरी होम क्वॉरंटाइनचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचं उलटं चित्रं पाह्यला मिळत आहे. आता सोसायट्यांमध्ये ७० टक्के रुग्ण सापडले असून झोपडपट्ट्यांमधून ३० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. यापूर्वी असं घडलं नव्हतं. त्यामुळे कोरोनाची साखळी वाढू नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे सोसायटीतील करोना रुग्णांची हिस्ट्री शोधून या इमारती सील करण्यात येणार आहेत, असं पालिकेचे परिमंडळ-७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी सांगितलं.