काँग्रेसने लोकशाही टिकवल्याने चहावाला पंतप्रधान
- मल्लिकार्जुन खरगे यांची नरेंद्र मोदींवर टीका
मुंबई : काँग्रेसने ७० वर्षांत देशातील लोकशाही टिकवली. त्यामुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला, अशी टीका काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी केली.
मल्लिकार्जुन खरगे यांची महाराष्ट्राच्या प्रभारीपदी निवड झाल्यानंतर रविवारपासून ते मुंबई दौऱ्यावर आले आहे. दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट शक्तीचा’ प्रारंभ केला.
या वेळी खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ७० वर्षांत काँग्रेसने काय केले? असे मोदी विचारतात. आम्ही काही केले नसते तर मोदी आज त्या खुर्चीवर बसले असते का? आम्ही लोकशाही टिकवली म्हणून एक चहावाला पंतप्रधान झाला. मोदी फक्त मोठय़ा मोठय़ा घोषणा करतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र दिसत नाही. रोज एक पूल कोसळतोय. आधी ते थांबवा, रेल्वे ट्रॅक सुधारा. मग बुलेट ट्रेनच्या गप्पा मारा. देशात गोरक्षणाच्या नावाखाली लोक मारले जात आहेत. दलित, अल्पसंख्याक, आदिवासींवर अत्याचार वाढले आहेत. देशाचे संविधान टिकले तर देश टिकेल, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
‘स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवा’
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. पण, ऐनवेळी आघाडीत बिघाडी झाल्यास स्वबळावर लढण्याचीही तयारी ठेवावी, असा सूर काँग्रेस नेत्यांच्या बठकीत व्यक्त करण्यात आला. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने ऐनवेळी आघाडी तोडली तेव्हा सर्व जागांवर उमेदवार शोधताना पक्षाला अडचण झाली होती याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा निर्णय देशपातळीवर झाल्याकडे खरगे यांनी लक्ष वेधले. पण, काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली मते लक्षात घेता आघाडी झाली नाहीच तर सर्व जागा लढण्याची तयारी ठेवा, अशी सूचना खरगे यांनी केली.