breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा ‘फेल’

सोलापूर – शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा फेल गेल्याचा टोला लोकतांत्रिक जनता दल शरद यादव गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी रविवारी सोलापुरात लगावला. भाजप आणि शिवसेना एकच असून शिवसेनेने विरोधी पक्षाची जागा खाल्ल्यामुळे भाजपला फायदा झाला. 2019 मध्ये केंद्रात संयुक्‍त महाआघाडीचे सरकार येईल, असा विश्‍वास देखील पाटील यांनी व्यक्‍त केला.

लोकभारती आयोजित शिक्षक मेळाव्यासाठी आ. पाटील सोलापुरात आले होते. डाक बंगला येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप-सेना सरकारवर टीका केली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोकभारतीचे शिक्षक भाजप सरकारविरोधात प्रचार करतील असे सांगताना पाटील यांनी सरकारवर कडाडून टीका केली. मोदी सरकारने दोन कोटी नोकर्‍या देण्याचे दिलेले आश्‍वासन खोटे ठरले आहे. लोकांच्या बँक खात्यात 15 लाख टाकण्याचे आश्‍वासन खोटे ठरले आहे. राज्यातील भाजप-सेना पक्ष एकच असून शिवसेना भाजपच्या मागेच जाणार, हे निश्‍चित आहे. राज्यात अडीच  लाख सरकारी पदे रिक्‍त आहेत. खासगी क्षेत्रातील 80 टक्के नोकर्‍या पंधरा टक्के उच्चभ्रू लोकांच्या हातात आहेत. सत्ता मिळाल्यापासून केंद्र व राज्य सरकारने विकासाची ठोस कामेच केली नसल्याने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा उचलला आहे.

शिवसनेचे नेते उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा फेल गेला, असेही पाटील यांनी सांगितले. भाजप-सेनेचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांची एकजूट आवश्यक आहे. प्रकाश आंबेडकर हे कधीच भाजपला पोषक निर्णय घेणार नाहीत. फॅसिस्ट आणि भांडवलदारांमुळेच समाजवादी चळवळ मोढून काढण्याचा प्रकार होत आहे. समाजवादी चळवळीतील सर्वांनी मनभेद सोडून एकत्र येण्याची गरज असल्याचेही आ. कपिल पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button