उत्तर प्रदेशात विषारी दारूमुळे १३ मृत्युमुखी
अन्य ४० जण अत्यवस्थ
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्य़ात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत १३ जण मृत्युमुखी पडले असून, अन्य ४० जण अत्यवस्थ आहेत, अशी माहिती मंगळवारी अधिकाऱ्यांनी दिली.
या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले असून यामागे राजकीय कट आहे का, यासह सर्व बाबींच्या अनुषंगाने चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या विषारी दारूकांडात एकाच कुटुंबातील चार जण मरण पावले आहेत. या घटनेनंतर अबकारी विभागाच्या १० अधिकाऱ्यांना आणि दोघा पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले असून सर्व बाबींचा विचार करून तपास अहवाल ४८ तासांमध्ये सादर करण्यास सांगितले आहे, असे कॅबिनेटमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी सांगितले.
येथील राणीगंज आणि शेजारच्या गावातील लोकांनी सोमवारी रात्री रामनगर परिसरातील एका दुकानातून विकत घेतलेली दारू प्यायली, मंगळवारी सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रामनगर समाज आरोग्य केंद्रात हलविण्यात आले.
आजारी पडलेल्या एकूण लोकांपैकी १६ जणांना किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठ रुग्णालयात हलवावे लागले तर अन्य पाच-साह जणांना बलरामपूर आणि लखनऊमधील रुग्णालयात हलविण्यात आले.