जळगावात उष्माघाताने शेतातच शेतकऱ्याचा मृत्यू
४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळताहेत जळगावकर
जळगाव : जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. सोमवारीदेखील ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या तीव्र झळांनी जळगावकर होरपळून निघत आहेत. पारोळा तालुक्यात एका शेतकऱ्याचा शेतातच काम करीत असताना रविवारी उष्माघाताने मृत्यू झाला.
करमाड (ता. पारोळा) येथील अर्जुन भगवान पाटील (वय ६८) या शेतकऱ्याचा चक्कर येऊन पडल्याने शेताच्या बांधावरच मृत्यू झाला. अर्जुन पाटील हे रविवारी सकाळी करमाड शिवारातील आपल्या शेतात गेले होते. तिथे बांधावर काम करीत असताना, त्यांना चक्कर आले आणि ते खाली पडले. त्यांना लागलीच पारोळा येथील कुटीर रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अर्जुन पाटील यांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पारोळा कुटीर रुग्णालयाचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील पारोचे यांनी दिली.