अहंकारी मोदी सरकारला झारखंडच्या जनतेनं नाकारलं- शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकारी राजकारणाला झारखंडच्या जनतेने नाकारलं अशी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. केंद्रातली सत्तेची ताकद आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपाला स्वीकारलं नाही. त्याबद्दल मी झारखंडच्या जनतेचे धन्यवाद देतो असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. सिल्व्हर ओक या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला डबल धक्का बसला आहे. सत्तेतून पायउतार व्हाव्या लागणाऱ्या भाजपाच्या जागाही दुपटीनं घटल्या आहेत. दुपारपर्यंत ३१ जागांवर आघाडीवर असलेली भाजपा अखेरच्या काही फेऱ्या बाकी असताना २३ मतदारसंघातच आघाडीवर आहे. तर काँग्रेस, जेएमएम आणि राजदला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तब्बल ४७ जागांवर तिन्ही पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत.
त्याचप्रमाणे झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली सत्तेची ताकद व आर्थिक ताकद न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे असं म्हणत शरद पवार यांनी भाजपाचा चांगलाच खरपूस समाचार घेतला .