बंगळुरू : ‘आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असून आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करावे’, अशी मागणी काँग्रेस आणि जेडीएसच्या शिष्टमंडळाने कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस आणि जेडीएसच्या शिष्टमंडळाने आमदारांच्या सह्या असलेले समर्थनाचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केले.
‘आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असून आम्ही कर्नाटकला स्थिर सरकार देऊ शकतो, यामुळे आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी दिली गेली पाहिजे’, असे कुमारस्वामी यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्याकडे एकूण ११७ आमदारांचे समर्थन असल्याचा दावा यावेळी कुमारस्वामी यांनी केला. दरम्यान दोन्ही पक्षांनी सत्तेचा दावा केला असून यावर कायदेशीर मार्गाने तोडगा काढला जाईल असे राज्यपाल वाला यांनी स्पष्ट केले आहे.