कटूपणा घेण्याची माझी तयारी, लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान
मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात प्रचंड हाहाकार माजला. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन पुकारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सुरुवातीला १५ दिवसांचा लॉकडाऊन पुकारण्यात आला. मात्र, कोरोना रुग्णसंख्या वाढत गेल्याने हा लॉकडाऊन आता १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे १ जूननंतर लॉकडाऊन उठणार की वाढणार याबाबत प्रश्न सामान्यांकडून विचारले जात आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं आहे.
मुख्यमंत्री म्हणाले,”राज्यात कोरोनाचा कहर उच्चांक गाठत असल्यानं देशभरात भीतीचं वातावरण होतं. पण मी राज्याच्या हितासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आणि त्यासंदर्भात मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की, कटूपणा घेण्याची माझी तयारी आहे. तो निर्णय आपल्याला घ्यावा लागला आणि नागरिकांनी खरोखर मनापासून सहकार्य केलं. त्यामुळे हे जे काही नियंत्रण आलेलं आहे, मात्र अजुन यश मिळालेलं नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे १ जूननंतरच्या निर्बंधाबद्दल सूचक विधान केलं आहे.
१८ ते ४४ वयोगटाचं लसीकरण… मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत
“कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही, पण नागरिकांनी घाबरू नये. घाबरण्याचं कारण नाही. मात्र दक्षता नक्की घ्यायला हवी. तिसरी लाट येऊ नये हा आपला प्रयत्न आहे. सध्याच्या लाटेत आपल्याला ऑक्सिजनसह अन्य बाबींचा तुटवडा जाणवला. भविष्यात आणखी तुटवडा जाणवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत मला महाराष्ट्र ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्यावर सोपवलेली आहे. महाविकास आघाडी सरकारची सहा कोटी नागरिकांसाठी दोन डोस याप्रमाणे १२ कोटी डोस एकरकमी घेण्याची तयारी आहे. मात्र दुर्दैवाने अजुनही लस पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण काही दिवसांसाठी स्थगित करावं लागलं,” अशी खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.