अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?
मुंबई – लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असं मतही त्यांनी मांडलं आहे.
लोकसभा निवडणुकीत देशभरात काँग्रेसची पीछेहाट होत असताना महाराष्ट्रातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची धूळधाण उडाली. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. खुद्द अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात धुव्वा उडाला. भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी त्यांचा ४० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. या पराभवाची जबाबदारी म्हणून अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत.
अमेठीतून पराभव झालेले काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही राजीनामा सादर केला आहे. आज होत असलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यावर निर्णय होणार आहे. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असले तरी त्यांचा राजीनामा फेटाळला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. अशोक चव्हाण यांनीही राहुल यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये व दिला तरी स्वीकारला जाऊ नये, अशी भूमिकाही चव्हाण यांनी मांडली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.