… अखेर 47 दिवसांनंतर मराठा तरुणांचे आंदोलन मागे
मुंबई |महाईन्यूज|
मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या 47 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजातील तरुणांनी आपलं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी म्हणून गेल्या 47 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानात जाऊन मराठा तरुणांचं आंदोलन सोडवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं.
‘महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/20018 मधील कलम 18 नुसार मराठा उमेदवारांना नियुक्ती मिळावी, म्हणून गेल्या 47 दिवसांपासून मराठा समाजातील तरुण आझाद मैदानात आंदोलन करत होते. आज या मागण्यांबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, आमदार भरत गोगावले आणि विनायक मेटे यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलक तरुणांची भेट घेतली. आणि आंदोलन मागे घेण्याच आवाहन केलं. त्यानंतर मराठा आंदोलक तरुणांनी आझाद मैदान गेले 47 दिवस सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलं.’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी या पत्रकात दिली.