भाजपाने धनगर समाजाला फसविले, सरकार वेळकाढू पणा करतेय
सांगली – भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षणाचे दिलेले आश्वासन पाळले नसून, सरकार वेळकाढूपणा करीत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करता येत नसेल, तर तुम्ही सभागृहात डमरू वाजवायला गेला आहात काय? महाराष्ट्रातील भाजप सरकार जुमलेबाजीतच अडकल्याची टीका गुजरात येथील पाटीदार समाज आरक्षण आंदोलनाचे प्रणेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
धनगर समाजाच्या महामेळाव्यासाठी हार्दिक पटेल विटामार्गे आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाकडे रवाना झाले. त्यापूर्वी त्यांनी येथे पत्रकारांशी संवाद साधून आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, धनगर समाजाला यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा थोर वारसा आहे. मात्र, या समाजावर अन्याय होत आहे. प्रत्येक राज्यात समाजाला लोकसंख्येनुसार शिक्षण, नोकरी व राजकीय आरक्षण दिले पाहिजे. परंतु, लोकसंख्येवर आरक्षण दिले तरी, प्रत्येक समाजात कष्ट घेणा-यांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे. कोणताही समाज जोपर्यंत शैक्षणिक प्रगती करीत नाही आणि घटनात्मक पध्दतीने मजबूत होत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही.
आपला देश घटनेवर चालतो. आरक्षण दिल्यानंतर प्रगती का होत नाही, याचा विचार सरकारने केला पाहिजे. गरिबांना सुविधा देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे जेथे समाजावर अन्याय होत असेल, तेथे केवळ विरोधी पक्षानेच आवाज उठविला पाहिजे असे नाही. आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी आता जनतेनेही रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली.