शेवटच्या क्षणी काँग्रेस एक उमेदवार मागे घेणार? महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू
मुंबई : राज्यात होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यासाठी शेवटची काही मिनिटे बाकी असताना महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान हालचाली सुरू आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू असून काँग्रेसने दोन उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा, अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मांडण्यात आली आहे.
राज्यात २० जून रोजी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. यातील चार जागा निवडून आणण्यासाठी लागणारी मते भाजपकडे असून पाच जागांसाठीची मते महाविकास आघाडीकडे आहेत. मात्र दहाव्या जागेसाठी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीत झालेली नाचक्की टाळण्यासाठी काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे घ्यावा, अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विधानपरिषदेसाठी नेमकं काय आहे समीकरण?
विधानपरिषदेला एका जागेसाठी २७ मतांचा कोटा आहे. हे मतदानही गुप्त पद्धतीने होणार आहे. त्यामुळे केवळ अपक्षच नव्हे, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील आमदारही कोणाला मतदान करतात, हे पाहणे शक्य नसल्यामुळे या पक्षांची मतेही फुटण्याची शक्यता आहे. भाजपच्या चार उमेदवारांना निवडून येण्याची फारशी चिंता नाही.
मात्र, पाचवा उमेदवार प्रसाद लाड व सहावा उमेदवार सदाभाऊ खोत या दोघांनीही आम्ही आरामात निवडून आणू, असे आता भाजपचे नेते बोलत आहेत. हे दोघेही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतरही रिंगणात राहिलेच, तर भाजप काहीही करून एकनाथ खडसे यांच्या विरोधात मोठा सापळा रचणार, तसेच शिवसेनेला टार्गेट करण्यासाठी पाडवी यांच्यामागेही भाजप लागणार, असे भाजपचे नेते खासगीत सांगत आहेत. आमशा पाडवी हे आदिवासी समाजातील असून, त्यांचा आमदारांशी फारसा संपर्कही नाही. तसेच शिवसेनेचे दुसरे उमेदवार सचिन अहिर हे माजी मंत्री असून, त्यांचे सर्व पक्षांत मित्र आहेत. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड हे देखील अहिर यांचे मित्र असल्याने अहिर यांच्या मतांवर भाजपकडून डल्ला मारण्याचा फारसा प्रयत्न होणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.