“औरंग्याच्या एवढा कसला पुळका?”; चित्रा वाघ यांचा आव्हाडांना सवाल
“महाराष्ट्र औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय रहाणार नाही”; चित्रा वाघ
मुंबई : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, ते स्वराज्य रक्षक होते, असं विधान राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवारांनी केलं. अजित पवारांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील वातावरण चांगलच तापलं असताना. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता असं वादग्रस्त विधान केलं आहं. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांना औरंग्याच्या एवढा कसला पुळका? असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
हातून सत्ता निसटल्यावर बावचळलेले लोक आहेत हे. संभाजीमहाराज यांचा अवमान करून पोट भरलं नाही तर आता त्या औरंग्याचं गुणगान गाताहेत. जितेंद्र आव्हाड कसला एवढा त्या औरंग्याच्या पुळका? तत्काळ माफी मागा नाहीतर उभा महाराष्ट्र तुमच्या सारख्या औरंग्याच्या अवलादीला गाडल्याशिवाय रहाणार नाही, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.
जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वेगळा इतिहास कुणी लिहिला असेल तर माहित नाही. कारण जितेंद्र आव्हाड हे कायमच आपल्या सोयीने इतिहास मांडतात. औरंगजेबाला हिंदू धर्माचा तिरस्कारच होता. त्यामुळेच संभाजीराजेंचे अतोनात हाल करत त्यांची हत्या औरंगजेबाने केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायमच हिंदू धर्माचा आणि हिंदू धर्मातील तत्त्वांचा अपमान केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही त्याऐवजी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर का म्हणायचं नाही? जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं एक मंदिर बनवावं आणि उद्घाटन करायला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं, असं शिंदे गट प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.
सावरकरांनी आणि गोळवलकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहून ठेवले आहे? ते वाचा… या शूरवीरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजीराजे हे स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते. यावर कोणी बोलेल का? संभाजी महाराज यांचे ज्याठिकाणी डोळे फोडले, तिथे विष्णूचं मंदिर होतं. मग औरंगजेब हिंदूद्वेष्टा असता किंवा क्रूर असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं ना?, असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.