भाजपने फंड दिल्लीला दिलाय, फडणवीसांना दिल्लीची चिंता: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार फंड दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या दिल्ली भेटीला कोपरखळी लगावली आहे. यावेळी त्यांनी ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचंही म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्लीत जाऊन आल्याची आठवण करुन दिली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी ते दिल्लीतील कोरोनाची पाहणी करण्यासाठी गेले असतील असं म्हटलेलं आहे. तसेच ते सध्या प्रत्येक गोष्ट दिल्लीत करत आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा आमदाराकीचा फंडही दिल्लीतच दिल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा साधलेला आहे.