आम्ही कुणालाही विसरलो नाही, योग्यवेळी दखल घेतो, अजित पवारांचं ओवेसींना प्रत्युत्तर
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीतील नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी करोनाचे नवे वेरियंट, विरोधकांकडून होणारे घोटाळ्याचे आरोप आणि एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे. करोनाच्या नव्या वेरियंटसंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि राजेश टोपे यांना माहिती घेण्यास सांगितल्याचं अजित पवार म्हणाले.
पुण्यात करोनाच्या नव्या वेरियंटचे सात रुग्ण आढळले आहेत त्यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना देखील त्याची माहिती घेण्यास सांगितलं आहे, असंही ते म्हणाले. मुंबईला गेल्यानंतर यावर अधिक चर्चा केली जाईल आणि आवश्यकता असल्यास जनतेला त्यासंदर्भात काळजी घेण्यासाठी सूचना देऊ, असं अजित पवार म्हणाले.
भाजपकडून मुंबई महापालिकेमध्ये कोविड घोटाळा झाल्याचा आरोप पत्रकारांनी विचारलं असता अजित पवार यांनी त्यावर देखील भाष्य केलं. प्रश्न विचारताना एका पत्रकाराकडून मुंबई महापालिकेचा नगरपालिका असा उल्लेख झाला, त्याला दुरुस्त करत अजित पवार यांनी मुंबई महापालिका असल्याचं सांगितलं. मुंबईच्या महापालिकेत घोटाळा झाला असा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, विरोधकांकडून अशा प्रकारचे आरोप केले जातात. कोणीही आरोप करत, ज्यामध्ये तथ्य नाही, अशा प्रकारचे आरोप केले जातात. तथ्य असेल तर त्याची दखल घेतली जाते, असं अजित पवार म्हणाले. एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींसमोर संजय राऊत यांचा मुद्दा मांडला मात्र नवाब मलिक यांना तुरुंगात जाऊ दिलं, असा आरोप केला होता. अजित पवार यांनी ओवेसी यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. आम्हाला कुणाचाही विसर पडत नाही. आम्ही कुणाची काळजी घ्यायची असते ती योग्यवेळी घेत असतो, असं अजित पवार म्हणाले.
खरिप हंगामात लागणाऱ्या बी-बियाणं, खत यांसदर्भात खरिपपूर्व आढावा बैठक झाली आहे. शेतकऱ्यांनी कसल्याप्रकारची टंचाई जाणवणार नाही, अशी दक्षता राज्य सरकार घेत असल्याचं अजित पवार म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माझ्याशी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी चर्चा केल्याचं अजित पवार म्हणाले.