राज्यात पुन्हा वादळी पावसाचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा
६ ते ७ एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता
पुणे : मागील महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा हवामान खात्याने राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ के.एस.होसालीकर यांनी ट्वीट केलं आहे.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवार आणि शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
४ ते ७ एप्रिल दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये ६ ते ७ एप्रिल रोजी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्येही ६ ते ७ एप्रिल दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरमध्ये ४ आणि ५ एप्रिल रोजी पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.