…हा तर ओबीसींवर घोर अन्याय; आम्ही याविरूध्द न्यायालयात धाव घेणार- पंकजा मुंडे
मुंबई – सध्या मराठा आरक्षण, पदोन्नतीस आरक्षण आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्दावरून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषदा आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी याविरोधात न्यायालयाच धाव घेणार असल्याचं सांगितलं आहे.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या 5 जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय अत्यंत संवेदनशील होत असताना या निवडणुका जाहीर होणं हा ओबीसींवर घोर अन्याय आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असं वक्तव्य राज्य सरकारमधील मंत्र्यांनी देखील केलं होतं. आम्ही तर याविरूध्द न्यायालयात धाव घेणार आहोत. तर, राज्य शासनाने न्याय देण्याची भूमिका तत्काळ घेण्याची गरज आहे. राजकीय आरक्षणाचा विषय मार्गी लागेपर्यंत या निवडणुका न घेण्याची भूमिका मांडण्याबरोबरच आमच्या समवेत कोर्टातही धाव घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, ओबीसी प्रवर्गासह पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षण झाल्यानं सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षण रद्द केलं होतं. त्यानंतर झालेल्या परिस्थितीत ही पोटनिवडणूक होत आहे. आता या प्रकरणात राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.