…तर पोलीस कारवाई करणारच’; अजित पवार यांचा राज ठाकरेंवर निशाणा
सांगली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून त्यात, ‘आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा’, असे म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेचा ताम्रपट कुणीच घेऊन आले नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. काही जण अल्टीमेटम देतात हे बरोबर नाही, हे हुकूमशाही राज्य नाही, हे लोकशाहीचे राज्य आहे. आपल्या वक्तव्यांनी समाजात दुही निर्माण होत असेल तर पोलिस कारवाई करणारच, असे अजित पवार यांनी राज ठाकरे यांना सुनावले आहे.
इस्लामपूर येथे आयोजित राष्ट्रीय २४ व्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. दुर्दैवाने काही लोक राज्यात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला. तसेच अयोध्येला जाण्याचा प्रकार सवंग लोकप्रियेतेसाठी व प्रसिद्धीसाठी हापापल्याचा प्रकार असून कमी खर्चात ती मिळते, असा टोलाही अजित पवारांनी राज ठाकरे यांचे नावन घेता लगावला आहे. राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना पवार म्हणाले की, कोणी अल्टीमेटमची भाषा वापरु शकत नाही, ही हुकूमशाही नाही, लोकशाही आहे. मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण मत मांडत असताना दोन जातींमध्ये तेढ निर्माण होणार असेल, तर मग ती व्यक्ती मी जरी असलो तरी आपल्यावरही कारवाई करण्याचा अधिकारी पोलीस खात्याला आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर खंजीर खुपसल्याचा आरोप केला आहे. याबाबत विचारले असता पवार म्हणाले की, भंडारा येथे नेमके काय झाले, नाना पटोले हे नेमके काय बोलले याची मला माहिती नाही. पण उद्या मुंबईत जाऊन याबाबत सर्व माहिती घेणार आहे. आमचे नेते प्रप्फुल पटेल यांच्याकडून नेमका काय प्रकार झाला आहे, याची माहिती घेण्यात येईल. पण राज्य स्तरावर निर्णय घेताना ते शरद पवार ,सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे घेतात आणि जिल्हा पातळीवर स्थानिक नेते निर्णय घेत असतात. मागच्या नगरपंचायत निवडणुकीत आम्ही राज्यस्तरावरून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व्हावेत असे प्रयत्न केले. पण अनेक ठिकाणी स्थानिक राजकारणामुळे स्थानिक स्तरावर वेगवेगळे निर्णय घेतले गेले. ते घडू नये ही आमची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.