तरुणाची हत्या करून मृतदेह पेटवला
- अमरावतीमधील प्रकार, पाच जणांना अटक
अमरावती |
कॅटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या एका तरुणाची चाकूने अनेक वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना रविवारी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग द्रूतगती वळणमार्गानजीक उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या बारा तासांत पाच आरोपींना अटक के ली. जुन्या वैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. रोहन ऊर्फ बच्चू किसन वानखडे (२२) रा. बेलपुरा असे मृताचे नाव आहे. शनिवारी सायंकाळपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, त्याचा पत्ता लागला नाही. दरम्यान, रविवारी सायंकाळी एका गुराख्याला राष्ट्रीय महामार्गाच्या लगत जंगलाच्या परिसरात एका तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्याने तातडीने बडनेरा पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी रोहनच्या शरीरावर चाकूचे अनेक वार दिसून आले. शिवाय, मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे घटनास्थळी ठसेतज्ज्ञ चमू व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. गुन्हे शाखेच्या पथकानेही घटनास्थळ गाठून पाहणी केली. मृतदेहाजवळील कागदपत्रांवरून तो रोहन वानखडे असल्याचे यावेळी समोर आले. त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. पूर्ववैमनस्यातून शनिवारी रात्री रोहनची चाकूने अनेक वार करून हत्या केल्यावर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध हत्या व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आकाश मोरे, करण इटोरिया, प्रशांत ऊर्फ सोनू चवरे, रोहित माधडे, नीतेश पिवाल, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे आरोपी हत्येनंतर पळून गेले होते. पोलिसांनी त्यांना वर्धा जिल्ह्य़ातील हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू के ली आहे.