सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारा मुख्यमंत्री जनतेला हवा आहे; मुनगंटीवार यांचा टोला
चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोहाच्या दारूसंदर्भातील राज्य सरकारच्या भूमिकेवर मुनगंटीवार यांनी ही टीका केली आहे. मोहाच्या देशी दारूला आता विदेशी दारू म्हणायचे, असा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. या सरकारकडे काहीही न करता त्याचे प्रमोशन करायची कला अवगत आहे. असे सरकार कुणालाही मुख्यमंत्री म्हणू शकते. मात्र सत्तेपेक्षा सत्यावर प्रेम करणारा मुख्यमंत्री जनतेला हवा आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना लगावला आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. महाविकास आघाडीवर निशाणा साधताना सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वाटत आहे, की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. तर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना वाटत आहे, की २५ वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असावा. मात्र भारतीय जनता पक्षाला आता असे वाटत आहे की ,जनतेची सेवा करणारा मुख्यमंत्री असावा.
राष्ट्रवादीचा खासदार सुप्रिया सुळें यांनी तुळजाभवानी देवीसमोर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे घातले. त्यावर संजय राऊतांनी उध्दव ठाकरेच २५ वर्षे मुख्यमंत्री असतील असे म्हटले. यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारली. त्यावर बोलताना मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत आहे. त्यात काही गैर नाही. आपल्या राज्यात ज्या पक्षाचे केवळ दोन आमदार आहेत त्यांनाही वाटते की आपण मुख्यमंत्री व्हावे. यासाठी काही देवाकडे साकडे घालतात. मात्र, ईश्वराचा अंश असलेल्या जनतेला कोण आवडतो, यावर जनता मुख्यमंत्री ठरवत असते. काहींना वाटते की राजभवनात जाऊन शपथ घेण्याची गरज नाही. ते एकमेकांना तुम्ही मुख्यमंत्री असे टोपणनावाने बोलावून मिरवू शकतात.’