Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सडीज बेबींनी संघर्ष पाहिला नाही; फडणवीसांचा पलटवार

मुंबई : बाबरी मशीद पाडली जात असताना मी तिथे उपस्थित होतो, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना युवासेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. फडणवीस तर १८५७ च्या उठावातही असतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य यांनी केलेल्या या टीकेचा आता देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. ‘तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सडीज बेबींनी ना संघर्ष केला आहे, ना संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात,’ असा पलटवार फडणवीस  यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘आमच्यासारखे लाखो कारसेवक जे बाबरी पाडली गेली तेव्हा तिथे उपस्थित होते त्यांना आजही गर्व आहे. मी हिंदू आहे आणि त्यामुळे माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्मामध्ये मी असेल तर १८५७ च्या युद्धामध्ये मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या बाजूने लढत असेल आणि तुम्ही असाल तर त्याही वेळी तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता तुम्ही अशा लोकांसोबत युती केली आहे जे १८५७ च्या युद्धावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते तर शिपायांचं बंड होतं, असं म्हणतात,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मनसेच्या आंदोलनावर भाष्य

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना आज राज्यभरात मशिदीच्या भोंग्यांबाबत सुरू असलेल्या असलेल्या मनसेच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली आहे. ‘फक्त हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला म्हणून राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणारं सरकार मशिदीच्या भोंग्यांवरून आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेणारच. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र सरकार जर आपली जबाबदारी पार पाडत नसेल तर राजकीय पक्षांना आपआपली भूमिका मांडावीच लागेल आणि ती मांडली जात आहे,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button